अजित पवारांविरुद्ध तीव्र संताप

yongistan
By - YNG ONLINE

मुंबई : प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएच. डी. धारकांबद्दल बोलताना ते काय दिवे लावणार, असा प्रश्न उपस्थित केला होता. उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या या बेजबाबदार वक्तव्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटले असून, या वक्तव्याचा विद्यार्थ्यांनी तीव्र निषेध केला. एवढेच नव्हे, तर अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री होऊन काय दिवे लावले, असा प्रतिप्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. एवढेच नव्हे, तर २०२४ च्या निवडणुकीत विद्यार्थीच दिवे लावतील, असा इशाराही देण्यात आला. 

सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा दिल्या जातात. त्यात पीएच. डी.साठी फक्त २०० विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती दिली जाते, त्यामुळे ही संख्या वाढवावी, अशी मागणी कॉंग्रेस आमदार सतेज पाटील यांनी सभागृहात केली होती, त्यावेळी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी पीएच. डी.धारकांची संख्या वाढवून काय करणार, पीएच. डी. करून पोरं काय दिवे लावणार, असा प्रश्न उपस्थित केला होता. यावरून विरोधी पक्षांच्या नेत्यांनी अजित पवार यांना लक्ष्य केले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यातून सरकारचा माज दिसून येतो. सरकारने अशी पीएच. डी. धारकांची थट्टा करू नये, असे म्हटले. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे सरकार शिक्षणविरोधी असल्याची टीका केली, तर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी नॉन ग्रॅज्युएट उपमुख्यमंत्र्यांकडून दुसरी काय अपेक्षा करणार, असा प्रश्न उपस्थित केला.

यासोबतच राज्यात विद्यार्थीही आक्रमक झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. सरकारने विद्यार्थ्यांना सुविधा देण्याचे काम केले. उलट त्यांनी काय दिवे लावतात, असा प्रश्न विचारून संशोधन करणाºया विद्यार्थ्यांचा अवमान केला आहे, असे म्हणतानाच त्यांनी उपमुख्यमंत्री होऊन काय दिवे लावले, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. राज्यभरातून या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातही याचे पडसाद उमटले. आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध केला. तसेच संशोधक विद्यार्थ्यांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर विद्यार्थी तीव्र आंदोलन करून सामूहिक आत्मदहन करतील, असा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला. एवढेच नव्हे, तर आम्ही यांचे २०२४ मध्ये दिवे लावू, असेही विद्यार्थ्यांनी म्हटले.    


हा पीएच. डी.धारकांचा अवमान

संशोधन करणाºया विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळालीच पाहिजे. देशात ज्यांनी पीएच. डी. मिळविली आहे, त्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अपमान केला आहे, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला असून, त्यांच्या या वक्तव्याचा विद्यार्थ्यांनी तीव्र निषेध केला.